‘कोणत्याही अभिवादनापूर्वी ‘वंदे मातरम्’ हे सर्वांत आधी आपल्या मुखी असले पाहिजे’
पुणे |
‘धर्माचे काम हिंसा नसून, माणसाला माणूस करणे आहे. कोणताही सनातन धर्म मानवतेचे (Humanity) काम करत असेल, तर तो वंदनीय आहे. मात्र, आपण प्रथम देशाचे नागरिक असून, त्यानंतर आपल्या जाती-धर्माचे आहोत. त्यामुळे कोणत्याही अभिवादनापूर्वी ‘वंदे मातरम्’ (Vande Maratam) हे सर्वांत आधी आपल्या मुखी असले पाहिजे,’ असे मत प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी रविवारी व्यक्त केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ परिषदेत ते बोलत होते. जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी, उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतोचे अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, परिषदेचे प्रायोजक विनोद मांडोत, समन्वयक राजेश सांकला, मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, उद्योजक नरेंद्र बलदोटा, विशाल चोरडिया यांच्यासह जीतोचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘माझ्यासाठी मानवता धर्म सर्वप्रथम आहे,’ असे नमूद करत गौर गोपाल दास यांनी आनंदी व यशस्वी जीवनाचे सार सांगितले. ‘यशस्वी होण्यासाठी पायऱ्या चढताना मन शांत असणे आवश्यक आहे. एकत्रित कामाचे समाधान आणि लोकांना मदत ही यशाची गुरुकिल्ली आहे. आपण मोठे होत असताना समाधानी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नातेसंबंध, आरोग्य, मित्र आणि परमेश्वराला विसरता कामा नये,’ असेही ते म्हणाले.
विजय भंडारी यांनी जीतोच्या सेवाकार्याची माहिती दिली. ‘करोना संकटकाळात पंतप्रधान सहायता निधीमध्ये २८० कोटी रुपयांहून अधिक मदत करण्यात आली आहे. देशभरात जीतो नगर उभारून एकूण चार हजार घरे बेघर समाजबांधवांना हस्तांतरित करण्यात येत आहेत. या सेवाकार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेत आर्थिक मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले. ओमप्रकाश रांका यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजन आणि प्रतिसादाबद्दल उपस्थितांचे कौतुक केले. पैसा असून समाधान नसेल तर जीवनात आनंद मिळू शकत नाही. अलिशान घरापेक्षा त्यातील नाती सुख देतात. महागड्या मोबाईलपेक्षा संवाद साधण्यात समाधान आहे. आनंदी राहण्याची जबाबदारी स्वत:ची आहे. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वत:ची शक्तीस्थळे शोधून आपल्या विकासासाठी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. – गौर गोपाल दास