‘मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही’
!['He will not get any electricity unless he turns off Matoshri's light'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/He-will-not-get-any-electricity-unless-he-turns-off-Matoshris-light.png)
परभणी|‘मुख्यमंत्री मंत्रालयात आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दररोज मंत्रालयातील वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेऊन माझ्या राज्यातील जनता कशामुळे त्रस्त आहे. याची माहिती माहिती घेणे अपेक्षित असते मात्र मुख्यमंत्र्यांना कुठे वेळ आहे. मातोश्री ची लाईट ठरवून २४ तास बंद करूया तेव्हा त्यांना कळेल बिना लाईट लोकांचे काय हाल होत आहेत. मातोश्री ची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही. अशा प्रकारचे आंदोलन करावे लागेल’, अशी टीका भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्या परभणी येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या ‘जवाब दो’ मोर्चा प्रसंगी बोलत होत्या
जाणता नेत्याच्या सुपीक डोक्यातून तयार झालेल्या महाभकास आघाडीचं सरकार चालू आहे
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतीचे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी मंगळवार १९ एप्रिल रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संतोष मुरकुटे, विलास बाबर यांच्यासह भाजपा पदाधिकार्यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, ‘दुपारच्या दीड दोन वाजता लाईट चालू आहेत. असा आंधळकर महाराष्ट्र मध्ये जाणता नेत्याच्या सुपीक डोक्यातून तयार झालेल्या महाभकास आघाडीचं सरकार चालू आहे. परभणी जिल्ह्याचे नशीब खूपच दुर्दैवी आहे. पूर्वीची पालकमंत्री झेंड्यासाठी यायचे त्यांनी दाऊद सोबत करून मुंबईमधील बॉम्बस्फोटांना अर्थसहाय्य केले. अशा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा अट्टाहास शरद पवार यांनी केला आहे.’, असंही बोर्डीकर यावेळी म्हणाल्या.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेथून मलिदा मिळेल त्या तिजोरीच्या चाव्या खुलतात
‘देशातील जनतेचे आयुष्य सुरक्षित करणाऱ्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. कोळसा मागेल तेवढा उपलब्ध आहे. अर्थमंत्र्यांना, जाणता राजाच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेथून मलिदा मिळेल त्या तिजोरीच्या चाव्या खुलतात. परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब दुर्दैवाने पाठ करण्यात व्यस्त आहेत. कुठेतरी मठात जायचे आहे की काय’, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.