चंद्रकांत पाटील कवी असते तर बरं झालं असतं
![It would have been better if Chandrakant Patil was a poet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/It-would-have-been-better-if-Chandrakant-Patil-was-a-poet.png)
अहमदनगर|‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजकारणी आहेत. मात्र, ते चांगल्या कवी कल्पना करतात. त्यामुळे ते राजकारण्यापेक्षा कवी असते तर अधिक बरं झालं असतं’, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. ‘शिवसेना सत्तेत असूनही भाजपने शिवसेनेची एवढी अवहेलना केली होती की आम्ही करण्यासारखं काही राहिलंच नव्हतं’, असं उत्तरही थोरात यांनी पाटील यांच्या आरोपाला दिलं आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
कोल्हापूर येथे बोलताना पाटील यांनी केलेल्या आरोपांना थोरात यांनी चांगलच उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले होते, ‘शिवसेनाला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचं मास्टमाइंड कारस्थान २०१९ मध्ये रचण्यात आलं. ही गोष्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आली नाही. भाजप आणि शिवसेनेच्या वादात आगीत तेल ओतण्याचं काम या विरोधकांच्या मास्टरमाइंडने केलं’, असा आरोप पाटील यांनी केला होता.
चंद्रकांत पाटील यांनी जे आरोप केले, ते चुकीचे आहेत. तेव्हा आम्ही विरोधात होतो. मात्र, शिवसेनेची जास्त अवहेलना सत्तेत सोबत असलेल्या भाजपनेचं केली. शिवसेनेला मंत्रिपदं देताना, खाती देताना नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली. प्रत्येकवेळी सतत अवहेलना केली. त्यामुळे विरोधक असूनही आम्ही काही करावं अशी परिस्थितीच नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. त्यात आम्ही तेल ओतण्याचा संबंधच नाही. सत्तेत एक पक्ष असला तरी कुरबुरी असतात. आम्ही तर तीन पक्ष एकत्र आलो आहोत. मात्र, आमचं काम उत्तम सुरू आहे. देशातील सरकारांचा सर्वे केला तर नक्कीच आमच्या सरकारने चांगलं काम केलं असल्याचं दिसून येईल, असंही थोरात यावेळी बोलताना विसरले नाही.