आधी मी त्यांना टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता…; आदित्य ठाकरेंचा मनसेला खोचक टोला
![I used to call them timepass gang, but now ...; Aditya Thackeray lashes out at MNS](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/raj-thakare.jpg)
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज यांनी केलेल्या ही टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली असून राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी मनसे भाजपची सी टीम असल्याचा टोला लगावला आहे. साम टीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे. आमचं हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचन पूर्ण करण्याचं आहे. ज्या पक्षांचा तुम्ही उल्लेख केलाय. त्यांना मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो. पण आता त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम ही एमआयएमची आहे आणि सी टीम मनसे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.
जो पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्याकडे लक्ष्य देण्याची गरज नसल्याचा टोलाही आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला. आपल्या राज्यामध्ये कोणाच्या तरी बोलण्यावरून वाद-विवाद वाढू नयेत व संवादाने राज्यात शांतता राहावी असे म्हणत हिंदुत्वासाठी सतत लढत राहायची गरज नसून राजकीय पक्षांद्वारे जनतेस देण्यात आलेली वचने जरी पूर्ण करण्यात आली तर तेही हिंदुत्वच आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं आहे.