राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांना उशीरा सूचले शहाणपण? म्हणे विशेष सभा घ्या!
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थायी समिती सदस्यांची भूमिका म्हणजे वरातीमागून घोडे…अशीच दिसत आहे. शहरातील विकासकामे झाली नाहीत, प्रलंबित विकासकामे मार्गी लावायची आहेत, असा दावा करीत सभागृहाचा कार्यकाळ संपलेला असताना ‘विशेष सभा’ घेण्याचा बालहट्ट या सदस्यांनी धरला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे महापौरांनी शहरातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक नाना काटे ,राजू बनसोडे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा शिलवंत-धर, प्रवीण भालेराव, मयूर कलाटे यांनी केली.
याबाबत महापौर माई ढोरे यांना राष्ट्रवादीकडून निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रलंबित विकासासाठी ही महासभा खूप महत्त्वाची आहे. याकरिता महापौरांनी निश्चित भूमिका सकारात्मक घ्यावी. विकासासाठी कुठलीही तडजोड नाही. या अनुषंगाने, पाच वर्षात झालेल्या विकास कामाची आणि सध्या भ्रष्टाचाराचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामुळे लोकांचा लोकप्रतिनिधी वरचा विश्वास कमी होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही स्थायी समिती सदस्य या नात्याने ही मागणी करत आहोत. त्यामुळे ही मागणी लवकर मान्य करून शहरवासीयांना ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास २० नगरसेवकांनी गेल्या ५ वर्षांत स्थायी समितीमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, एकदाही भ्रष्टाचार आणि विकासकामांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे ऐकीवात नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकासकामांची आठवण झाली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.