जतमध्ये शिवपुतळय़ावरून तणाव; मोठय़ा प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त
![जतमध्ये शिवपुतळय़ावरून तणाव; मोठय़ा प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/sangli1.jpg)
जत |
जतमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण करण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रसंग घडू नये,यासाठी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आल्याने जतला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याच ठिकाणी असलेल्या शिवपुतळय़ाची १६ वर्षांपूर्वी क्षती झाली होती. यामुळे नवीन पुतळा बसविण्याचे ठरविण्यात आले. यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखालील पुतळा समितीने सर्व ती तयारी केली असून मिरजेतील मूर्तिकारांकडून पुतळाही बनविला आहे.
मात्र, प्रशासनाने आवश्यक त्या बाबींची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच पुतळा बसविण्याची परवानगी दिली जाईल अशी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, पुतळा बसविण्यात येऊ नये यासाठी प्रशासनावर राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचा दबाव असल्याचा आरोप करीत जगताप यांनी कोणत्याही स्थितीत शिवजयंती दिनी पुतळा अनावरण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर जगताप यांचा हा आरोप राजकीय असल्याचा पलटवार आ. सावंत यांनी केला आहे. यावरून निर्माण झालेल्या संघर्षांमुळे जतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तीन उप अधीक्षक, २० निरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाचे अधिकारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, गृहरक्षक दलाच्या तीन तुकडय़ा असे एक हजाराहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा जागता पहारा आहे. शहरात पथसंचलनही करण्यात आले.