महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोनाचा वेग वाढला-नरेंद्र मोदी
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यास सांगण्यात येत तेव्हा मुंबईतील काँग्रेसचे नेते कामगारांना गावी जाण्यास मदत करत होते. त्यांना तिकिट देऊन तिथून हुसकावून लावत होते. त्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार झाला, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान बोलत होते. त्यांनी यावेळी सुरुवातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजलीही वाहिली.
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.
ते पुढे असंही म्हणाले की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठा बदल झाला. मी स्पष्टपणे पाहतोय की कोरोना संकटानंतर जग एक नव्या व्यवस्थेकडे पुढे जात आहे. एक असा टर्निंग पॉईट आहे. आपण भारताच्या रुपाने ही संधी गमावता नये. भारताने एका लिडरशिप रोलमध्ये स्वत:ला कमी समजलं नाही पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही एक संधी आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल तेव्हा आपण सामर्थ्यवान होऊ हा संकल्प केला पाहिजे’, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.





