विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील : देवेंद्र फडणवीस
मुंबई | प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नियमात बदल केल्यामुळे भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता . मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेले आहेत. ते भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. यापार्श्वभूमीवर आम्ही विरोध दर्शविला होता. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि लेजिसलेचरमध्ये एक्झिक्यूटिव्हला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही या विरोधात आवाज उचलला. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीसंदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपालच निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा करण्यात येणार आहे . काँग्रेसकडे हे पद असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. नुकताच काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा नितीन राऊत यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे राऊत यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे विधानसभेचं अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला आणि शिवसेनेकडील वन खातं काँग्रेसला देण्यावर विचारविनिमय सुरु असल्याचे बोलले जात आहे . मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तसेच फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरूनही सरकारवर ताशेरे ओढले. आणखी गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार? असा उलट सवाल करत केवळ पाच दिवसाचे अधिवेशन ठेवणे म्हणजे अधिवेशन गुंडाळण्याचा सारखे आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटालाही व्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठांना बूस्टर डोज देण्याची घोषणा केली . या निर्णयाचे स्वागत फडणवीस यांनी केले आहे. तसेच यामुळे ओमिक्रॉनविरोधात लढण्यास बळ मिळेल, असे फडणवीस म्हणाले.