नायक नही ‘खलनायक’ हू मैं……
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/khalnayak.jpg)
‘संजू’बद्दल एकिकडे उलटसुलट चर्चा सुरु असतानाच चित्रपटाने मात्र लोकप्रियता आणि गल्ला पेटीवर नवीन विक्रमांचा धडाकाच लावला आणि अशातच संजय दत्तच्या करियरमधील सर्वाधिक बहुचर्चित आणि वादग्रस्त देखील ‘खलनायक’ (१९९३) चित्रपटाची आठवण येणे अत्यंत स्वाभाविक आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण निर्माता-दिग्दर्शक सुभाष घईने नाना पाटेकरला ‘नायक’ म्हणून घेऊन ‘खलनायक’ साकारण्याची तयारी सुरु केली होती. ‘परदेस’च्या निमित्त सुभाष घईच्या दीर्घ मुलाखतीचा योग आला असता अशा काही गोष्टीही माहित झाल्या. पण मग संजय दत्त कसा काय आला?
नानासोबतच्या तीन चार बैठकांमध्ये सुभाष घईच्या लक्षात आले की सेटवर काही वाद होऊ शकतात त्यापेक्षा आपण ‘नायक’च बदलूया. (तत्पूर्वीच अमिताभ बच्चनसोबतचा सुभाष घईचा ‘देवा’ एका चित्रीकरण सत्रातच बंद झाला होताच.) सुभाष घई मूळचा पटकथाकार! आता संजय दत्त ‘खलनायक’ साकारणार म्हटल्यावर तो अधिकच मसालेदार आणि मनोरंजक असायला हवा या दृष्टिने त्याने चित्रपटात काही बदल केले. राम केळकर व सचिन भौमिक हे सुभाष घईंचे हुकमी पटकथालेखक. मानवी मूल्ये, नाती, योगायोग आणि फिल्मी गोष्टी याचा मेळ ते छान जमवत आणि घई उच्च निर्मिती मूल्ये, सुपर हिट गीत (आनंद बक्षी), संगीत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल ) व नृत्य (सरोज खान) त्याचप्रमाणे पडदाभर दृश्य सौंदर्य यातून आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश प्राप्त करणारा. आपल्या जवळपास प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर अथवा बाह्यचित्रीकरण स्थळावर आम्हा सिनेपत्रकारांना ते बोलवणारच.