पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंना दिल्या मराठीतून शुभेच्छा!
![Prime Minister Narendra Modi wishes Babasaheb Purandare in Marathi!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pm-narendra-modi-babasaheb-purandare-1.png)
मुंबई |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याचा गौरव केला जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी सुरुवातीलाच बाबासाहेबांना चक्क मराठीतून शुभेच्छा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव सांगितला.
- “बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो..!”
आपल्या संदेशाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरेंना मराठीतून शुभेच्छा देत साष्टांग नमस्कार केला. “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मी सुरुवातीलाच साष्टांग नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचं आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो”, अशा मराठीतून शुभेच्छा मोदींनी दिल्या.
“२०१९मध्ये देशानं त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. २०१५मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. मध्य प्रदेशमध्येही शिवराजसिंह चौहान सरकारने देकील बाबासाहेब पुरंदरेंना कालिदास पुरस्काराने सन्मानित केलं होतं. शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेब पुरंदरेंची इतकी भक्ती उगीच नाही. शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेतच. पण भारताचा वर्तमान आणि भूगोलही त्यांच्या अमर गाथांनी प्रभावित आहे”, असं देखील मोदींनी यावेळी नमूद केलं.
- “..त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत!”
“शिवाजी महाराजांची अनेक कामं आजही अनुकरणीय आहेत. बाबासाहेब पुरंदरेंनीच स्वतंत्र भारतातील नव्या पिढीला शिवाजी महाराजांचं आयुष्य सांगण्याचं काम केलं आहे. त्यांच्या लेखांमध्ये आणि पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल त्यांची अतूट श्रद्धा दिसून येते. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं आयुष्य, त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यात जे योगदान दिलंय, त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत”, असं देखील मोदी म्हणाले.