दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी इस्कॉनसोबत करार
पालघर – दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि इस्कॉन यांच्यात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शेती संशोधनासाठी ५ वर्षांचा सामंजस्य करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत शेतीविषयी विविध प्रयोग केले जाणार आहेत. तसेच शेतीक्षेत्रात नव्या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यावर या सामंजस्य कराराच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.
वाडा येथील इस्कॉन, गोवर्धन इको व्हिलेज गालतरे येथे एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दोन्ही संस्थांचावतीने कुलगुरू डॉ. एस. डी.सावंत, कृषी संशोधनचे संचालक डॉ. पराग हळदणकर, ब्रजहरी दास आणि सनतकुमार दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. या कार्यक्रमास पालघरचे खासदार राजेंद्र गावित उपस्थिती होते. या सामंजस्य कराराअंतर्गत भाताची सेंद्रिय शेती, औषधीय वनस्पतींची लागवड, सुधारीत जातीच्या बांबूची लागवड व त्यावरील आधारित लघुउद्योग, बारमाही सुगंधी चाफ्याची लागवड आणि त्यापासून अत्तर निर्मिती, विविध फळे व फुलांची शेती, बीजबँक, जंगलातील औषधी व रान भाज्या आणि खाण्यायोग्य फळांची लागवड, पिकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित केलेल्या फळझाडे आणि फुलझाडे तसेच कपिला वाणाच्या गाईची जोपासना करणे. या सामंजस्य करारातून या प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. तसेच या अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांची सर्वांगीण उन्नती करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत.