मुंबईतील कलर कोड पद्धत बंद, अवघ्या सात दिवसांत निर्णय मागे
मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनांसाठी कलर कोड पद्धत अंमलात आणली होती. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबईतील ही कलरकोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत
मुंबईतील पोलीस उपायुक्त अभियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (18 एप्रिल) मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर काही ठराविक रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र मुंबईतील वाहनांची वर्दळ कायम होती. यामुळे ही पद्धत सुरु करण्यात आली होती. यानुसार अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. कोणत्या रंगाचा स्टिकर वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते.
त्यामुळे मुंबई पोलिसांनी तयार केलेली ही पद्धत अवघ्या सात दिवसात त्यांच्यासाठी तापदायक बनली होती. त्यामुळे पोलिसांनी हा कलर कोडचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.