भारतीय शांती सेनेच्या कार्याचे कौतूक
संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेने मार्फत दक्षिण सुदान मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याने तेथे केलेल्या कार्याबद्दल संयुक्तराष्ट्रांकडून कौतूक केले जात आहे. पुर्व अफ्रिकेतील या युद्धग्रस्त देशात भारतीय सैन्याने तेथे शांतता आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या कामात जे योगदान दिले आहे ते उल्लेखनिय आहे असे संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे.
दक्षिण सूदानच्या उत्तरपुर्वेकडील जोंग्लेई भागात अकोबो येथे फेब्रुवारी पासून भारतीय सैन्याचा तात्पुरता तळ उभारण्यात आला आहे. तेथील हिंसाचार ग्रस्त नागरीकांना मदत करण्याचे काम या सैन्याने केले. हा भाग सुदान मधील बंडखोरांच्या ताब्यात आहे. कायम अस्थिर आणि अशांत असलेल्या या भागात भारतीय सैन्याने बऱ्याच अंशी शांतता प्रस्थापित केल्यानंतर आता येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली वाढू लागल्या आहेत अशी माहिती भारतीय लष्कराचे बटालियन कमांडर लेफ्टनंट कर्नलसिंग नेगी यांनी सांगितली.
संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेच्या बॅनर खाली भारतीय सैन्याने येथे नियमीत पहारा देऊन लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे त्यामुळे या भागातून निर्वासित झालेले लोकहीं आता तेथे परतु लागले आहेत. एकूण सुमारे 71 हजार निर्वासित आता अकोबो परिसरात वास्तव्याला आले आहेत. याचे श्रेय तेथील शांतीसेनेत कार्यरत असलेल्या भारतीय जवानांना दिले जात आहे.