छत्रपती शिवाजी महाराज मुळचे कन्नड भूमीतील, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बरळले
बेळगाव –बेळगाव आणि महाराष्ट्रामध्ये सीमावाद सुरू असतानाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मुळचे कन्नड भूमितील असल्याचं त्यांनी म्हटलं. ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं गोविंद कार्जोळ म्हणाले. ते म्हणाले की, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते. उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी वातावरण बिघडवायचे काम करू नये असे गोविंद कार्जोळ म्हणाले.
कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या बसला काल काळी शाई लावली. लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी, कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर कर्नाटकच्या बसवर लावले होते. त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेऊन आंदोलन छेडले. गुलबर्गा इथे गुलबर्गा-सोलापूर ही महाराष्ट्राची बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केवळ घोषणाबाजीवर ते थांबले नाही तर त्यांनी चक्क काचांवर काळी शाई लावली.





