संजीवन सोहळ्यानिमित्त माउली जयघोष.. टाळ-मृदंगाच्या निनादात प्रदक्षिणा
आळंदी |महाईन्यूज|
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधिदिनानिमित्त कार्तिकी वारीतील कार्तिकी एकादशी (दि. ११) ची पालखी नगरप्रदक्षिणासाठी देऊळवाड्यातून बाहेर पडली. माउली नामाचा जयघोष आणि टाळमृदंगाच्या निनादात प्रदक्षिणा अल्प वारकर्यांच्या उपस्थितीत सुरु झाली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधीदिनानिमित्त कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमीला म्हणजेच (ता. ८) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरूवात झाली. कार्तिक वद्य एकादशी (ता. ११) आणि माऊलीचा संजिवन समाधीदिन कार्तिकी वद्य त्रयोदशीला (ता. १३) होणार आहे. कार्तिकी वारीस (ता. ८) सुरूवात झाली. अल्प वारक-यांच्या उपस्थितीत प्रथा परंपरा पाळल्या जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी लागू झाल्याने मंदिर परिसरात सध्या पोलिस बंदोबस्त आहे. प्रथा परंपरा आणि संचारबंदीचा आदेश दोन्हीचा संगम साधून वारी होत आहे. कार्तिकी एकादशीला (ता. ११) आज पहाटे माऊलींच्या समाधीवर मंत्रोच्चारात अभिषेक, दुधारती झाली.
दरवर्षीप्रमाणे दुपारी एक ते रात्री आठ माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देवूळवाड्याच्या बाहेर पडली. आज आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेत प्रदक्षिणा सुरु केली. रस्त्याच्या दुतर्फा भाविक दर्शनासाठी उभे होते. दुपारी दोनला पालखी हजेरी मारुती मंदिरात विसावली. येथे दिंड्याची हजेरी घेवून पालखी पुन्हा देऊळवाड्यावर पोहचेल.