राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. मात्र आता हा अडथळा दूर झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे आता २२ आणि २३ ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या नागालँड, मिझोरम व त्रिपुरा आणि शनिवारी आसाम व मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर, इत्यादी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला.