कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार
मुंबई – देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे, हा वाढता संसर्ग लक्षात घेता आता संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार होते. मात्र, आता एक आठवडा आधीच संसदेचे हे अधिवेशन उरकले जाणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत कोरोनाची स्थिती लक्षात घेता सर्व महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर हे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत सर्वच पक्षांच्या खासदारांचे एकमत झाले आहे.
संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. या आतापर्यंतच्या दिवसांमध्ये तब्बल एकूण १६२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात ३० खासदार वगळता संसदेतील अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. २ कॅबिनेट मंत्र्यांना देखील कोरोनाने संसर्ग झाला आहे. गंभीर म्हणजे आतापर्यंत लोकसभेतील २ आणि राज्यसभेतील एका खासदाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे, हे अधिवेशन लवकर उरकण्याचा मानस आहे.
संसदेच्या या अधिवेशनादरम्यान कोरोना स्थितीत काढलेले ११ अध्यादेश संसदेत मंजूर करुन घेण्यावर सरकार विशेष प्रयत्नशील आहे. या एकूण ११ अध्यादेशांपैकी ७ लोकसभा आणि ४ अध्यादेश राज्यसभेमध्ये मंजुर झाले आहेत. या महत्त्वाच्या अध्यादेशांमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित ३ अध्यादेश असून राज्यासह देशभरात याविरोधात आवाज उठवला जात आहे. मात्र, तरीही सरकार आपल्या या निर्णयावरून मागे हटत नसल्याचे दिसत आहे.