जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाचा नकार
नागपूर – जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना येण्यास अडचणी असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. यावर न्या. रवि देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्यासमक्ष सोमवारी तातडीची ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकार आणि संबंधित विभागाने 15 दिवसांत निर्णय घ्यावा, परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे, मात्र आजची परीक्षा होणारच, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, जेईई (मेन्स) (JEE-Mains) परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. जेईई (मेन्स) परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत, तर ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबरला नियोजित आहे. कोरोना प्रादुर्भावातही परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यातच परवानगी दिली.
मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवश्यकता असते. परंतु पूर्व विदर्भातील जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांना पुरामुळे शेवटच्या क्षणी अभ्यासाची संधी मिळालेली नाही. शिवाय प्रवासासाठी वाहने नाहीत. अनेक विद्यार्थी पुरामुळे अडकले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय होण्यात अनेक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत जेईई आणि नीटची परीक्षा देणे शक्य नसल्याचे पत्र भिवापूर येथील एका विद्यार्थ्यांने उच्च न्यायालयाला लिहिले. या पत्राची न्यायालयाने दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली आणि सोमवारी यावर ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.





