देशातील असंघटित कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळावी
- बाबा कांबळे यांची सरकारकडे मागणी
- कष्टकरी महिलांच्या हस्ते केले ध्वजारोहण
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड येथील कष्टकरी कामगार पंचायत वतीने राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम करून, कष्टकरी महिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्न अधिक गंभीर होत असून देशातील ४५ कोटी असंघटित कष्टकरी जनतेला साधी सामाजिक सुरक्षा देखील मिळत नाही, या प्रश्नांबाबत चर्चा सत्र पार पडले.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, देहूरोड धम्म सदनचे के. एच. सूर्यवंशी, अनिता सावळे, अजय लोंढे, स्वातंत्र्यसैनिक इसाक राज, दैवत पाटील, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले की, देशातील ४५ कोटी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशातील सर्व असंघटित कष्टकरी कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा व्हावा. यासाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने हे वर्ष सामाजिक सुरक्षा वर्ष साजरे केले जाणार आहे.
या वर्षी देशातील ४५ कोटी असंघटित कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा आणि म्हातारपणी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी देशभर आंदोलन करून सरकारकडे मागणी करणार आहे. सरकारला निवेदन देऊन देशभर असंघटित कामगार कष्टकरी जनतेची चळवळ उभी करणार आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अशा कांबळे, रूपाली थोपटे, जयश्री सोनपाखरे, जनाबाई सूर्यवंशी, सिंधू मोरे, दुर्गा नाटेकर, गजराबाई कांबळे, प्रतीक्षा शिंगारे यांनी कार्यक्रमाचे संयोजनासाठी परिश्रम घेतले.