मावळ गोळीबार : खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनिल शेळके यांनी हुतात्मा शेतक-यांना वाहिली श्रध्दांजली
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात तीन शेतक-यांचा बळी गेला. येळसे येथील त्यांच्या हुतात्मा स्मारकाला खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनिल शेळके यांनी आज रविवारी (दि. 9) श्रध्दांजली वाहिली.
पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळातील शेतक-यांनी आंदोलन करत पुणे-मुंबई महामार्ग अडवला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकरी कुटुंबातील सदस्य कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण होत असून आज खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनी आज येळसे येथील हुतात्मा स्मारक येथे आंदोलनात मृत पावलेल्या शेतक-यांना श्रध्दांजली वाहिली.
पुणे जिल्ह्यातील पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास मावळ भागातील शेतकऱ्यांचा विरोध होता. या प्रश्नावरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान मोर्चातर्फे ९ ऑगस्ट २०११ रोजी एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर या मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.