राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकावर – श्रीपाल सबनीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/annabhau-sathe-1-e1501596163723.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
वेबिनारच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रबोधन घेणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि देशातील एकमेव महानगरपालिका आहे. परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. जसे भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्व आहे तेवढच महत्व सामाजिक न्यायाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्व २०२० च्या आजच्या चौथ्या दिवशी सामाजिक न्यायाची समीक्षा या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी अतिरिक आयुक्त प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष दत्तु चव्हाण, सचिव संजय ससाणे, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे, मुख्य संघटक मेघराज साळवे,भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा. धनंजय भिसे, हनुमंत कसबे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.
श्रीपाल सबनीस म्हणाले की, भारत सुरक्षित राहिल्याशिवाय देशातील सर्व समाज सुरक्षित राहू शकत नाही. आजच्या काळामध्ये आर्थिक समानतेचा न्याय देशातील गोरगरीबांना देणे आवश्यक आहे व त्यासाठी देशांतर्गत शांतता असणे आवश्यक आहे. बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवणे आवश्यक आहे. पाकिस्तान व चीन सारख्या देशांचा आपण एकत्र येऊन प्रतिकार केल्याशिवाय भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला आपण न्याय देऊ शकत नाही. ७० वर्षांमध्ये लोकशाही देशात रुजली परंतु बंधुता रुजलेली दिसत नाही म्हणूनच जातींच्या भिंती आजही समाजामध्ये दिसून येत आहेत. समाजील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत भाकरी पोहचत नाही
त्याला माणूस म्हणून समाजामध्ये स्थान देत तो पर्यंत भारतीय संविधानाचा ध्येयवाद अपुरा राहणार आहे. अण्णाभाऊ साठे यांची नाळ स्वामी विवेकानंद यांच्याशी जुवळत असल्याचेही ते म्हणाले.
अजित केसराळीकर म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊन देखील देशामध्ये समता प्रस्थापित झालेली दिसून येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पंचसुत्रीद्वारे सामाजिक न्याय देणारी लोकशाही या देशाला अर्पण केली. देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
अॅड. भूपेंद्र शेंडगे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंब-या, पोवाडे यांच्या माध्यमातून जी पात्रे उभी केली ती स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी जवळीक साधणारी होती. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजातील प्रत्येक घटकाला एक आकार दिला आहे. अण्णाभाऊ साठे यांचा एक पोवाडा ऐकून रशियातील लोक जागृत होऊन आपल्या देशात अध्ययनासाठी येतात तसेच आपण देखील त्यांच्या साहित्यातून प्रेरित होणं आवश्यक आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या
साहित्यातून सामाजिक न्यायाची भूमिका मांडल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्व २०२० च्या आजच्या दिवसाची सुरुवात सनई वादक सोनू काळोखे यांच्या पारंपारिक सनई वादनाद्वारे करण्यात आली.
अॅड. श्रीधर कसबेकर म्हणाले, सामाजिक न्यायाची चिकित्सा करणे आज आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे का हे पाहणं आवश्यक आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये मातंग समाजातील अनेक लोकांचं मोठं योगदान आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यापासून प्रेरित होवून अनेक साहित्यिक निर्माण झाले. मातंग सामाजितील लोकांनी साक्षर होऊन सामाजिक प्रगती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
त्यानंतर महादेव खंडागळे आणि संच यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने प्रबोधन परवाच्या चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली. वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२० ला फेसबुक व युट्युबच्या माध्यमातून १२ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला.