राज्यात दुकाने सुरू ठेवण्यासाठी २ तास वाढवले
मुंबई : कोरोनामुळे राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता हळूहळू शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे.आता, राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी २ तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी काढले आहेत. आजपासून, (९ जुलै) ही संमती देण्यात आली आहे. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत काल (७ जुलै) यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील दुकांनाना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी २ तास वाढवून देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती.
मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमधील कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील ७ दिवस परवानगी देण्यात आली आहे. या क्षेत्रातील दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी ९ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे.