रायगड जिल्ह्यात चक्रीवादळात नुकसानीच्या तातडीची मदत १०० कोटी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रायगड । महाईन्यूज । प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात चक्रीवादलामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सध्या तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपये देण्यात येतील. अर्थातच ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाचा धोका पावसामुळे देखोल वाढू शकतो, इतर रोगराई पण थांबवायची आहे. आपण कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. वीज पुरवठा सुरळीत करणे, टेलिकॉम यंत्रणा दुरुस्त करणे, घरांची दुरुस्ती याला प्राधान्य देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.