“छोटी हॉटेल्स, पोळी-भाजी केंद्र, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं”- राज ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-131.png)
राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यावर आर्थिक संकट आले आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे महाराष्ट्राचे रूतलेले अर्थचक्र बाहेर काढावेच लागेल. अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील, असं आवाहन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
राज ठाकरेंनी या पत्रात असे म्हटले आहे की, ‘गेल्या ३५ दिवसांपासून राज्यातील उपहारगृहं आणि रेस्टोरंट्स पूर्णपणे ठप्प आहेत. ह्याचा फटका जसा हॉटेल व्यवसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे. तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबईसह इतर शहरांमध्ये हॉटेल ही चैनीची गोष्ट राहिली नाही तर ती गरजेची बनली आहेत, असे त्यांनी सांगितले.
अनेक छोटी हॉटेल्स, पोळी-भाजी केंद्र, खानावळी आहेत. जिथे माफक दरात राईसप्लेट मिळते अशा हॉटेल्सची आणि खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचे आहेत. या खानावळी आणि हॉटेल्सची संख्या प्रचंड आहे. कारण ह्या माफक दरात मिळणाऱ्या राईसप्लेट्सवर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. ज्यांच्या घरात जेवण बनवणारी व्यक्ती नाही किंवा पुरेशी साधनसामुग्री नाही त्यांचा विचार आता सरकारने केला पाहिजे, जे वास्तव आहे ते सरकारने स्वीकरले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. १८ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन आहे. अजून किती दिवस ही परिस्थिती राहिल याची खात्री नाही. अशा काळात वाईन शॉप्स सुरु करुन राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे?, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसंच, वाईन शॉप्स सुरु करा याचा अर्थ दारु पिणाऱ्याचा विचार करा असा नाही. तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हाच अर्थ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…