पंकजा मुंडेंना मुलाने विचारलं, तु निवडणुकीत का जिंकली नाहीस?
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून परळी विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. त्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला.
परळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने निवडणुकीत का जिंकली नाहीस? असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला सांगितले की, आपण अभ्यास केला, मात्र पेपर दुसऱ्यांनीच तपासला. पंकजा मुंडे सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभात बोलत होत्या.
त्यांनी मुलाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, माझ्या मुलानं विचारलं आई तु इतकी चांगली आहे, मग तू जिंकली का नाहीस? मी सांगितलं जसा तुझा पेपर तु लिहितो म्हणून तुला सांगता येतं की मला इतके मार्क आहेत. आमच्याकडे मी अभ्यास करते, पेपर दुसरे असतात. मला लोकांनी विचारलं तुम्ही काय करता? मी सांगितलं एखाद्या पायाला फ्रॅक्चर झाली की माणूस कसा आराम करतो आणि त्याचे मित्र येऊन त्यावर सह्या करतात तसं माझं सध्या चाललं आहे.
निवडणुकीतील माझा पराभव हा केवळ काही काळासाठी झालेल्या फ्रॅक्चरसारखा आहे, अशा फ्रॅक्चरला फारसे जिव्हारी लावून घ्यायचे नसते. अपयश आल्यामुळे खचून न जाता विद्यार्थ्यांनी पुन्हा यशस्वी भरारी घेण्यासाठी सज्ज व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याची निराशा झाली. वॉटर ग्रीड प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्याला डावलण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.