वडिलांवरील कलंक पुसला गेल्याने दिलासा – कुमारस्वामी
बंगळूर – कर्नाटकात 2006 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसने भाजपशी युती केली. माझ्या त्या कृतीमुळे माझे वडील आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्यावर कलंक लागला. तो आता धर्मनिरपेक्ष आघाडी सत्तारूढ झाल्याने पुसला गेल्याची बाब माझ्यासाठी मोठाच दिलासा आहे, असे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी म्हटले.
कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर कुमारस्वामी बोलत होते.
जेडीएसला बहुमत नसल्याची जाणीव मला आहे. जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला नसल्याने मी व्यथित आहे. असे असले तरी वैयक्तिक हित पूर्ण करण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आम्ही जनतेसाठी कार्य करू. आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आघाडी सरकार पूर्ण करेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. भाजपच्या सभात्यागाचा उल्लेख त्यांनी पलायनवाद अशा शब्दात केला.
यावेळी कुमारस्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. केंद्र सरकार राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांसारख्या यंत्रणांचा वापर करत आहे. मी मलेशियामध्ये कंपनी सुरू केल्याचा आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचा दावा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. ईडीच्या एका सदस्यानेच मला ही माहिती दिली. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे, असे म्हणत त्यांनी कुठल्या दबावापुढे न झुकण्याचा निर्धार बोलूून दाखवला.