भाजपच्या सत्तेत रायगड संवर्धनाचे एक टक्काही काम झालं नाही
मला जबाबदारीतून मुक्त करा -खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्याना विनंती
मुंबई |महाईन्यूज|
छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड ही राजधानी आहे. भाजप सत्तेत असताना रायगड संवर्धनाचे काम घेण्यात आलं. मात्र, गेल्या दोन वर्षात एक टक्काही काम झालं नाही. या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असून संबंधित अधिकारी-ठेकेदारांकडून खुपच दिरंगाई सुरु आहे. त्यामुळे या जबाबदारीतून मला मुक्त करा, अशी विनंती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.
ते म्हणाले की, भाजपकाळात कोट्यवधीचा निधी देवूनही गेल्या दोन वर्षात रायगड संवर्धनाचे काम रखडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मला कोणी मोठं नाही. म्हणून या कामात काही चूक व्हायला नको. वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यावर आवाज उठवला पण कामात सुधारणा होत नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भ्रष्टाचाराबद्दल संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या संवर्धनाची जबाबदारी तुम्हीच पार पाडा, असं खासदार संभाजीराजेंना सांगितले आहे.