शरद पवार म्हणाले वेळीच आरोपींना अटक केली असती, तर…
महाईन्यूज|
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर आरोपींनीच प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. पीडितेवर चाकूने वार करून आरोपींनी तिला पेट्रोल टाकून पेटवून दिले. पीडिता ८० टक्के भाजली आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.शरद पवार यांनी ट्विट करून यासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. “उन्नावमधील सामूहिक बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडित तरुणीला जिवंत जाळल्याची घटना ऐकून धक्का बसला आहे. पीडिता सध्या मृत्युशी झुंज देत आहे. जर आरोपींना वेळीच अटक केली असती, तर ही घटना घडली नसती. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी,”असं पवार यांनी म्हटलं आहे.
उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात होती. यावेळी या घटनेतील आरोपींनी तिच्या अचानक हल्ला केला. डोक्यावर काठीनं प्रहार केल्यानंतर पीडिता खाली कोसळली. त्यानंतर आरोपींनी तिला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पीडितेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह राजकीय नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.