वडाळा कोठडी मृत्यूची मानवी हक्क आयोगाकडून दखल
वडाळा कोठडी मृत्यूप्रकरणाची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने गुन्हे शाखेला तपास अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आयोगाने गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना नोटीस धाडून १४ नोव्हेंबरला कोठडी मृत्यूची चौकशी आणि या प्रकरणी दाखल झालेल्या अन्य गुन्ह्य़ांच्या तपासाची माहिती द्यावी, अशी सूचना केली.
२७ ऑक्टोबरच्या रात्री विजय सिंह नावाच्या तरुणाचा वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात एका प्रेमी युगुलाशी वाद झाला. तेथे पोलीस पोहोचताच तरुणीने विजय आणि त्याच्या दोन मित्रांवर छेडछाडीचा आरोप केला. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. मात्र मध्यरात्री विजयची प्रकृती खालावली आणि त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विजयच्या कुटुंबाने पोलिसांच्या मारहाणीने विजयचा मृत्यू झाला, असा आरोप केला. तसेच दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवून बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली.
प्राथमिक चौकशीतून नियम न पाळल्याचा ठपका ठेवत पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. तसेच प्रेमी युगुलाविरोधात विजयला मारहाण करणे आणि खोटी तक्रार देणे याबद्दल स्वतंत्र गुन्हा नोंदवला.
कोठडी मृत्यूप्रमाणे चौकशी करण्याच्या सूचना देत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले. पाठोपाठ युगुलाविरोधातील गुन्हय़ाचा तपासही गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने दोन्ही प्रकरणांची चौकशी, तपास सुरू केला आहे.
विजयच्या मृतदेहाची जेजे आणि केईएम येथे चिकित्सा पार पडली. मात्र विजयच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी आणखी काही चाचण्या होणार आहेत.