सरकारने पाच वर्षात काय केलं, हा जाब कोण विचारणार? – राज ठाकरे
मुंबई | महाईन्यूज
गेल्या पाच वर्षात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुंबईमध्ये पूल पडले, त्याखाली चिरडून माणसं मेली. त्याचा कुणाला काहीही फरक पडला नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी सरकारवर केला. गेल्या पाच वर्षात काय केलं? असा जाब सरकारला कोण विचारणार, असा प्रश्नही त्यांनी नागरिकांना विचारला.
निवडणूक आली की अनेक हुजरे तुमच्यासमोर मुजरे करतात. त्यानंतर तुम्हाला विसरुन जातात. मागची पाच वर्षे काय झालं? पाच वर्षात काय आश्वासनं दिली होती, हे सगळे विसरतात. ग्रामीण भागात शेतकरी बांधव आत्महत्या करतो आहे. त्याची कुणाला काहीही पर्वा नाही, अशीही टीका राज ठाकरेंनी केली.
मुंबईतील भांडुप या ठिकाणच्या सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेना यांनी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळलं नाही. मात्र, याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बँक बुडाली तरीही नुकसान झालं, ते सामान्य माणसाचं होतं. अनेक बँकांचं नुकसान होणार. नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. देशातले उद्योग धंदे बंद होत गेले. या एका निर्णयाचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागत आहेत, अशीही टीका राज ठाकरेंनी केली.
महाराष्ट्र एवढा हतबल का झाला?
मुंबईतील हिरे व्यवसाय बुडाला, अनेक व्यवसाय बुडाले. गुजरातमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली. एका फटक्यात १० हजार माणसं नोकरीवरून काढली जात आहेत. नोकऱ्यांची वानवा आहे, ही वेळ कशी आली? ती कुणी आणली? याचा थोडा विचार करा. भाजपाकडे गडगंज पैसा आहे, तो कुठून आला? त्यांना प्रश्न कोण विचारणार? असा हतबल महाराष्ट्र पाहू शकत नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अटकेपार झेंडा लावणाऱ्या महाराष्ट्राची ही काय अवस्था करुन ठेवली आहे ते पाहिलंत का? अशीही खंत राज ठाकरेंनी बोलून दाखवली.