जम्मू-काश्मीरमध्ये घुसले 60 विदेशी दहशतवादी
- स्थानिक युवकांचे दहशतवादी गटांमध्ये जाण्याचे प्रमाण घटले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून घुसखोरीच्या कारवायांत वाढ झाली आहे. देशात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवाद्यांची घुसखोरी पाककडून करण्यात येत आहे. त्यातच आता आणखी 60 विदेशी दहशतवादी गेल्या महिनाभरात जम्मू- काश्मीरमध्ये घुसले असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या सर्व दहशतवादी कारवायांना भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरच्या स्थानिक युवकांची दहशतवादी गटांमध्ये भरतीचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी केला. गेल्या 45 दिवसांत फक्त दोघेजण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याचे ते म्हणाले. लष्कर आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह अनेक यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानंतर घुसखोरी केलेल्या परदेशी दहशतवाद्यांची संख्या निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.