मोबाईलचा अतिवापर टाळा, मुलांबरोबर तुम्हीही व्यायाम करा, राज्यमंत्री बाळा भेगडेंचा पालकांना सल्ला
तळेगाव, (महाईन्यूज) – मोबाईलचा अतिवापर होत असल्यामुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत चालला आहे. त्यामुळे दहावीत शिकणारा विद्यार्थी देखील पाचवीचा वाटत आहे. मोबाईल वापरत असेल तर मुलांच्या बाबतीत पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले. तळेगावमधील खासगी शाळेत पालकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. त्यांनी पालकांना देखील मुलांबरोबर व्यायामाचा सल्ला दिला.
राज्यमंत्री भेगडे म्हणाले की, आज शाळेतील मुलांचा मैदानी खेळ खेळण्याकडे असणारा कल कमी होत चालला आहे. मोबाईलचा अतिवापर होत आहे. टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्याकडे मुलांचा कल वाढत चालला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे शारीरीक संतुलन बिघडत चालले आहे. उत्तम शरीरयष्टीसाठी आज मुलांना सकस आहार देण्याची गरज आहे. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रोत्सहन द्यावे. प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होणारे सुदृढ शरीर होण्यासाठी पालिकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थी भविष्यातील आव्हान स्वीकारू शकतो का, याचा विचार करून त्याची जडणघडण करावी. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सुध्दा व्यायाम करावा, असा सल्ला राज्यमंत्री भेगडे यांनी दिला.