डहाणूत शेतकऱ्याचा मृत्यू
डहाणू : डहाणू तालुक्यातील किन्हवली येथील साखरशेत नदी ओलांडताना कैलास बाबू नडगे (वय २९ ), अलकापूर, बैजापाडा हा शेतकरी पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली होती. मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह दाभाडी चिंचपाडा येथे सापडला. दरम्यान, कुटुंबीयांस चार लाखांची मदत तर डहाणू शहरात प्रभुपाडा, सावटा तसेच बोर्डी येथे १२ जणांच्या घरात काल पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
त्या घरांचा पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार राहुल सारंग यांनी दिले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांत धानीवरी दहीगाव, डहाणू आंबेवाडी, साये येथे आठ ठिकाणी भिंत कोसळून नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी भूकंपामुळे पडझड झालेली ३० घरे तसेच सोमवारी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेली घरे यांना सरकारकडून एकत्रितपणे मदत देण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यात काशीनाथ रामा तांबडा रा. धानीवरी, दहीगाव आणि विनोद विलास धांगडा, बंगली, आंबेवाडी तसेच साये येथे घरे जमीनदोस्त झाल्याने कुटुंब उघडय़ावर पडल्याच्या घटना सोमवारी घडल्या आहेत.