शरद पवारांच्या पक्षापेक्षा अन् शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार; तरीही शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी नाही, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दहशतवादाला खतपाणी घालून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले. त्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे. खासदारांचे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देईल. तेथे ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील. खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध का आणि कसे कारवाई केली हे स्पष्ट करेल. या शिष्टमंडळावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, या सगळ्या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1ची व्यक्ती कोण असेल तरी ती शशी थरूरच आहेत. त्यांनी युनायटेड नेशनमध्ये काम केले आहे. उत्तम काम केलं आहे, पण आता हा विषय भाजपने राजकीय केला आहे. त्यांना प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची खाज आहे. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत, हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार? इतक्या घाई घाईने हे करायचे गरज नव्हती. हे माझं मत मी तुम्हाला सांगतो आहे. विरोधी पक्षाची दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी विशेष अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर बाबत अधिवेशन घ्यावं आणि चर्चा करावी. तुम्ही त्यावर कोणतीही चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाहीये. दुसरी मागणी ट्रम्प यांच्यासोबत अशी काय चर्चा झाली हे सांगावे, त्याची माहिती द्यायला तयार नाही. हे सगळं कोणी ठरविल किरेन रिज्जुजी यांनी, संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातील नावे काढलेली दिसत आहेत, असा हल्लाबोल सजंय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा – एक देश, एक निवडणुकीमुळे खर्चात बचत; संसदीय समितीच्या अध्यक्षांचा दावा
तर आम्हाला विचारलं होतं का शिवसेनेचा पाठवताना, त्यात तृणमुल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी दिसत नाही. मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जात आहे, हे कोणत्या आधारावर सांगत आहात, शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहेत. शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटापेक्षा आमचा एक सदस्य जास्त आहे. लोकसभेतील आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला देखील मिळायला पाहिजे आमचे देखीस सदस्य जास्त आहेत. याचा अर्थ ते इथे देखील राजकारण करत आहेत. सरकारी खर्चाने हे वऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती, हे वऱ्हाड निघालं आहे, युरोपला, आफ्रिकेला, पण ते जाऊन काय करणार आहेत. परदेशात आपले हाय कमिशन आहे, ते काम करत आहेत, मग काय गरज आहे, जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत त्याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. पंतप्रधान 200 देश फिरले तरी एकही देश पाठिशी उभा राहिला नाही. म्हणून त्यांच्यावरती ही नौंटकी करण्याची वेळी आली आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. INDIA ब्लॉकचे जे सदस्य चालले आहेत त्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, असंही पुढे ते म्हणालेत.
तुम्ही सरकारच्या सापळ्यामध्ये सापडत आहात. सरकारने जे गुन्हे आणि पाप केलं आहे, त्यांची वकिली करायला ते चालले आहेत. दहशतनादाचा बीमोड करण्याची क्षमता तयार झालेली असताना ट्रम्प यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून पाकच्या दहशतवादाला मोकाट सोडलं, हे तुम्ही जाऊन सांगणार आहात का? ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न तुम्ही वॉश्गिंटनला जाऊन विचारणार असाल तर जा असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.