केंद्रीय मंत्री संजय कुमार यांच्या मुलाला अटक! अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप

Bandi Sanjay Kumar | केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजप खासदार संजय कुमार बंडी यांचा मुलगा भगीरथ साई याला तेलंगण पोलिसांनी अटक केली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याच्या आरोपावरून सायबराबाद पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भगीरथ साई विरोधात ‘लुकआऊट सर्क्युलर’ देखील जारी केले होते, ज्यामुळे त्याला देश सोडून जाण्यास बंदी होती.
या खळबळजनक कारवाईनंतर केंद्रीय मंत्री संजय कुमार बंडी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “न्यायव्यवस्थेसमोर सगळे समान आहेत. माझ्या मुलाचे म्हणणे आहे की त्याने कोणतेही गैरवर्तन केलेले नाही. मात्र, आता त्याला पोलिसांनी अटक केली असून, कायदेशीर तपासात जे काही सत्य असेल ते समोर येईल.”
हेही वाचा
केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
दुसरीकडे, या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून तेलंगणा रक्षण सेनेच्या अध्यक्षा कविता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट मागणी केली आहे. “भगीरथ साई याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी संजय कुमार यांना केंद्रीय मंत्रिपदावरून तातडीने हटवण्यात यावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये,” असे कविता यांनी म्हटले आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
भारतीय न्याय संहितेतील पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत भगीरथ साई विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. १७ वर्षांच्या एका मुलीचं शोषण केल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली. सदर मुलीच्या आईने असाही आरोप केला आहे की भगीरथ साईचे तिच्या मुलीशी संबंध होते आणि त्याने तिचं लैंगिक शोषण केलं, लैंगिक छळही केला. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भगीरथनेही या प्रकरणात एक तक्रार दाखल केली. ज्यात त्याने आरोप केला होता की सदर मुलीने तिच्या कौटुंबिक कार्यक्रमात आणि सामूहिक आयोजन असलेल्या ठिकाणी बोलावलं होतं. तसंच आम्ही काही मंदिरांमध्येही गेलो होतो. मुलीच्या आई वडिलांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला. त्यानंतर पैसेही मागितले. ते दिले नाहीत तर आम्ही तुझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करु अशी धमकी मला दिली. ज्यानुसार मला अडकवलं जातं आहे अशी तक्रार भगीरथ साईने दाखल केली होती. भगीरथने त्याच्या तक्रारीत हा दावाही केला आहे की सदर मुलीच्या वडिलांना मी ५० हजार रुपये दिले होते. मात्र नंतर या मुलीच्या कुटुंबाने पाच कोटी रुपये मागितले. पाच कोटी रुपये देण्यास मी नकार दिला तेव्हा तिच्या आईने आत्महत्या करण्याचीही धमकी दिली असंही भगीरथ साईने तक्रारीत म्हटलं आहे.





