नगरसेवक नाही, तर लोकसेवक म्हणून काम करणार; प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावाती प्रचार
आदर्श नगर, संभाजीनगर परिसरात सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन गाठीभेटी; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून, प्रियंका बारसे, भीमाताई फुगे (काकी), अमर फुगे आणि राहुल गवळी या चौकडीने प्रचाराचा धडाका लावला आहे. आदर्श नगर, संभाजीनगर आणि प्रज्वलित मित्र मंडळ परिसरात घरोघरी जाऊन या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
स्थानिक उमेदवारांना जनतेची पसंती
या चारही उमेदवारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते याच प्रभागातील स्थानिक रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील जनतेशी त्यांचे अतूट नाते असून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. “बाहेरचा उमेदवार नको, तर आपल्या सुख-दुःखात धावून येणारा स्थानिक उमेदवार हवा,” ही जनतेची भावना या उमेदवारांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.

हेही वाचा : भीम क्रांती सामाजिक संस्थेचा प्रभाग १२ तळवडे–रुपीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलला जाहीर पाठिंबा
सत्ता नसतानाही कार्याचा धडाका
”नगरसेवक नसलो तरी लोकसेवक म्हणून काम करणे कधीच थांबवले नाही,” या भावनेतून या उमेदवारांनी आजवर अनेक प्रलंबित प्रश्न स्वबळावर मार्गी लावले आहेत. कोरोना काळ असो वा दैनंदिन नागरी समस्या, हे उमेदवार थेट उपलब्ध असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यांच्या या सक्रियतेमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विकासाचा ‘अजेंडा’ प्रमुख आश्वासने
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना या उमेदवारांनी कोणावरही वैयक्तिक टीका न करता केवळ ‘विकास’ हाच मुख्य मुद्दा ठेवला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी खालील मुद्द्यांवर भर दिला:
पाणी, रस्ते आणि स्वच्छता: प्रभागातील मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणार.
स्मार्ट प्रभाग: आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी युक्त प्रभाग बनवण्याचे स्वप्न.
थेट संवाद: नागरिकांच्या तक्रारींसाठी कार्यालयाचे दरवाजे सदैव उघडे ठेवण्याची ग्वाही.
युवा व ज्येष्ठांचे संघटन: सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा कायापालट करणार.
”मी केवळ राजकारण म्हणून नाही, तर समाजकार्याची तळमळ म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. गेल्या दहा वर्षांत जनतेने जो विश्वास दाखवला, त्याला पात्र ठरण्यासाठी मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे.”
— उमेदवारांची सामूहिक भावना




