राज्यातील विद्यापीठांच्या कारभारावर राज्यपालांची नजर, दिले महत्वपूर्ण निर्देश…

मुंबई : नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅकिंग फ्रेमवर्क मध्ये राज्यातील विद्यापीठांची कामगिरी खालावल्याचे पडसाद मंगळवारी (दि. २८) राजभवनात उमटले. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील २४ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची दृक-श्राव्य बैठक घेत विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. तसेच, सर्व विद्यापीठांनी दर तीन महिन्यांनी आपल्या कार्याचा अहवाल राजभवनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञान द्यावे, उद्यमशील बनवावे. तसेच, विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक घडवावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंशी झालेल्या पहिल्याच संवादात केली. या संवाद सत्राला राज्यातील सर्व २४ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच निवडक विभागांचे सचिव उपस्थित होते.
विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी, तसेच विद्यापीठांचे राष्ट्रीय गुणांकन सुधारावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठांचे गुणांकन घसरत आहे ही चिंतेची बाब आहे, असे सांगून विद्यापीठांनी यासंदर्भात पावले उचलावी, असे राज्यपालांनी राजभवनाकडे सांगितले. पाठवण्याच्या कार्यअहवालामध्ये विद्यापीठांनी आपल्या अडचणी-समस्याही मांडाव्या, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.
हेही वाचा – मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी मुदत द्या; राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती
तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. याकरिता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी अधूनमधून व्याख्याने – कार्यशाळा आयोजित करून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या कार्यात आपल्या विद्यार्थ्यांना तसेच एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे, अशी सूचना राज्यपालांनी केली. भारतीय ज्ञान प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी शाळांना भेटी देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्यास उच्च शिक्षणातील युवकांचे प्रमाण सध्याच्या २७ टक्क्यांहून वाढेल, असेही राज्यपाल देवव्रत यांनी नमूद केले.
युवक – विद्यार्थी खेळले नाहीत, मैदानावर गेले नाहीत व त्यांनी घाम गाळून आपल्या उर्जेचा सदुपयोग केला नाही, तर त्या उर्जेचा ते निश्चितच दुरुपयोग करतील, असे राज्यपाल म्हणाले. विद्यापीठ महाविद्यालयांनी आपली क्रीडांगणे व इतर क्रीडा सुविधा सुस्थितीत ठेवाव्या, क्रीडा विभाग बळकट करावा तसेच किती विद्यार्थी खेळावयास जातात व क्रीडा सुविधांचा उपयोग करतात या गोष्टींकडे लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तिमाही अहवालात नमूद करावी, अशा सूचनाही राज्यपालांनी दिल्या.
विद्यापीठ – महाविद्यालयांनी आपली वसतिगृहे, भोजन कक्ष, स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत की नाही हे तपासले पाहिजे. आपण हिमाचल प्रदेश येथे राज्यपाल असताना स्वतः विद्यापीठांच्या हिमाचल प्रदेशमधील स्वच्छतागृहांची वाईट दशा पाहिली होती, असे सांगून राज्यपालांनी कुलगुरू अधिकाऱ्यांनी वसतिगृहे नीट आहेत की नाही, हे पाहावे; अधूनमधून विद्यार्थ्यांसह तेथे भोजन करावे. सर्वच गोष्टी वॉर्डनच्या भरवश्यावर सोडू नये, असे निर्देशही दिले. वसतिगृहे ही व्यसनाची केंद्रे होऊ नये याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे व ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.




