विधानभवनमध्ये दोन दिवसीय संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन….

मुंबई : संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत होणार असून महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये “प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर विचारमंथन होईल.
हेही वाचा – ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; फडणवीसांसह अनेक राजकीय नेत्यांचा योग दिनी सहभाग
या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसद, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दिनांक २४ जून, २०२५ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पत्रकार परिषद होईल.
परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत.