पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडला ; विमानतळावरच अजित डोभाल यांच्यासोबत हाय-प्रोफाइल बैठक

PM Modi Emergency Meeting : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडला. त्यानंतर ते थेट आज सकाळी दिल्लीला परतले. दिल्ली विमानतळावरच उतरताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांनी त्यांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. आता थोड्याच वेळात, पंतप्रधान मोदी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील.
या हल्ल्याला गांभीर्याने घेत, पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या की दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. तसेच या हल्ल्यात जखमींना त्वरित सर्व शक्य ती मदत पुरवावी. या दहशतवादी हल्ल्यामुळे, पंतप्रधान मोदींनी त्यांचा दोन दिवसांचा सौदी अरेबिया दौरा कमी करून मंगळवारी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाने आयोजित केलेल्या अधिकृत डिनरला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून देशात परतण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण
त्याअगोदर, पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही असे सांगितले. त्यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. बाधित लोकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.” ते म्हणाले, “या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल…त्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार दृढ आहे आणि तो अधिक मजबूत होईल.”