पंचगंगेची पाणी पातळी २६ फुटांवर, NDRF च्या तुकड्या कोल्हापूरकडे रवाना
कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे यंत्रणा देखील अलर्टवर गेल्या असून पुराचा फटका बसणाऱ्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या तुकड्या आज संध्याकाळपर्यंत कोल्हापुरात पोहोचतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या २ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा (Rain) जोर कायम आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत असून दुपारी २ वाजता पंचगंगा पाणी पातळी २६ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले असून मलकापूरकडे जाणाऱ्या रोडवर मोठ्या प्रमाणत चिखल साचला असल्याने येथील एसटी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला असून २ एनडीआरडीएफच्या तुकड्या सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पुण्याहून २ एनडीआरडीएफच्या कोल्हापूरकडे रवाना झाल्या असून त्या संध्याकाळपर्यंत कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाल यांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, पिंगळाई नदीला पूर





