रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता
मुंबई – काही दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत डेटा बाॅम्ब फोडला होता. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून हा डेटा लीक झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावलं आहे.
काही दिवसांपुर्वी रश्मी शुक्ला यांचा एक अहवाल लीक झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा अहवाल आपल्याकडं असल्याचं सर्वांना दाखवलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं होतं. त्यानंतर आता या प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. त्याचा एक अहवाल त्यांनी वाचून दाखवला होता. तर हे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे दिले होते. हे पुरावे रश्मी शुक्ला यांच्याकडून लीक झाल्याचं समोर आलं होतं. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी कृत्यासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांनी याचा गैरवापर केला असा आरोप देखील त्यांच्यावर आहे.
दरम्यान, सध्या रश्मी शुक्ला या हैदराबाद येथील निवासस्थानी आहेत. त्यांच्या निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. उद्या म्हणजे, 28 तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते.