मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट घालू नये- देवेंद्र फडणवीस
मुंबई – कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 400 झाडे कापावी लागतील, शिवाय ज्या कार डेपोची किंमत 400-500 कोटी आहे, त्याची किंमत 4 हजार, 5 हजार कोटीवर जाईल, मुंबईकरांना लवकर मेट्रोही मिळणार नाही, वेळेचा अपव्यय होईल. अधिकारी मुख्यमंत्र्यांना भूलथापा देऊन चुकीची माहिती देत आहेत. त्याला मुख्यमंत्री बळी पडत आहेत. आता मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यासाठी सरकारकडे लॉजिकच नाही, त्यामुळे दुसरी कमिटी नेमली आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट घालू नये, जे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा असा घणाघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांज आज पत्रकार परिषदेत संवाद साधला.
मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत आहे, असे पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. शिवाय, हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खाजगी विकासकांना मोठे आर्थिक लाभ देण्यासाठी सुद्धा हालचाली होत आहेत. हा प्रकार उघडकीस येईल, तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.





