दहीहंडी सरावादरम्यान ६ व्या थरावरून कोसळून ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

मुंबई | दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव असे या चिमुकल्या गोविंदाचे नाव असून, तो नवतरुण मित्र मंडळ पथकाचा सदस्य होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणे दहाच्या सुमारास पथकाने ६ थरांचा मानवी मनोरा रचला होता. महेश हा ६ व्या थरावर होता. सरावादरम्यान तो अचानक कोसळला आणि खाली झेलण्याआधीच थेट जमिनीवर आपटला. तातडीने त्याला दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा : कर संकलन विभागाची ऑनलाईन सेवा नागरिकांसाठी ठरतेय उपयुक्त!
दहीहंडी उत्सव (१६ ऑगस्ट) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईसह राज्यभरात सराव सुरू आहेत. उंच थर रचण्याच्या स्पर्धेमुळे पथके रात्रभर तयारी करत आहेत. मात्र या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी आयोजक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सरावादरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्याचे पोलिसांनी सांगितले.





