कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात सरकार लाॅकडाऊन लावेल की काय? अशी शंका लोकांच्या मनात होती. पण सरकारने सर्वांना काही प्रमाणात दिलासा देत राज्यात संपुर्ण लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने राज्यात कडक लाॅकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधीपासून परप्रांतिय तसेच राज्यातील पुणे आणि मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या मजुरांनी स्थालांतर करण्यास सुरवात केली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना स्थलांतर न करण्याचं आवाहन केलं आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही ठिकाणी कामगारांचं स्थलांतर चालू आहे. कामगारांनी स्थलांतर करू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. राज्य सरकार आणि प्रशासन मजुरांच्यासोबत आहे, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे आणि खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था ही चालूच राहणार आहे. मात्र त्यांना देखील सरकारने आखलेल्या नियमांचं पालन करावं लागेल. प्रवास व्यवस्था चालूच राहणार असल्याने कोणतीही भिती बाळगू नये, असं आवाहन केलं त्यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने तसेच उद्योग त्याचबरोबर कामगारांचे काम बंद होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. कामगारांनी उद्योगधंदे चालू राहण्यासाठी हातभार लावावा, असं आवाहन देखील हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.