पिंपरी-चिंचवडमध्ये उद्घाटने करीत चंद्रकांत पाटील कुठल्या अधिकाराने मिरवतात : संजोग वाघरे-पाटील
- महापौर उषा ढोरे यांनी राष्ट्रवादीने दिलेल्या पदांना विसरू नये
- भाजपाला शरद पवारांच्या दौऱ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?
पिंपरी । प्रतिनिधी
एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या आणि साधा आमदार असलेले चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केलेल्या विकासकामांची उद् घाटने करीत कोणत्या अधिकाराने मिरवतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने नगरसेवक, पदाधिकारी झाले, स्थायी समिती सभापती झाले… उपमहापौर झाले. मान दिला, ही बाब माईंनी विसरू नये, असा सल्लाही वाघरे-पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोमवारी पुणे मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. तसेच, फुगेवाडी ते पिंपरी असा प्रवासही केला. या दौऱ्यात महापौर किंवा महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले नाही. यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. तसेच, महापौर माई ढोरे यांनीही मेट्रो प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे-पाटील यांनी प्रत्त्यूत्तर दिले आहे.
संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, शरद पवार हे राज्यसभेचे सन्मानीय सदस्य आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एखादा राज्यसभा सदस्य लोकोपयोगी विकासकामांची पाहणी करु शकतो. त्यात गैर काहीच नाही. पण, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना ही बाब खटकते. दुसरीकडे, शहराच्या विकासात शून्य योगदान असताना आणि एक साधा आमदार असताना चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये येवून विविध विकासकामांची उद्घाटने करतात. त्यावेळी राजशिष्टाचार कुठे असतो? असा प्रश्नही वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना विकासकामांच्या उद् घाटनांची निमंत्रण पत्रिका उशीरा दिली जाते. वास्तविक, पालकमंत्री या नात्याने महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाने अजित पवार यांची वेळ घेवून विकासकामांच्या उद् घाटन कार्यक्रमांचे नियोजन केले पाहिजे. पण, तसे होत नाही. प्रोटोकॉलची भाषा करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला राजशिष्टाचार शिकवू नये, असा टोलाही वाघेरे-पाटील यांनी लगावला आहे.