राज्यात ४० हजार रुग्णांची वाढ, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाखांवर थांबली
मुंबई – राज्यात गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा परिणाम आता जाणवायला सुरुवात झाली आहे. कारण गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार ९२३ रुग्णांची वाढ झाली आहे. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आज नव्या रुग्णांची संख्या एकदम ४० हजारांखाली गेल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या २४ तासांत ३९ हजार ९२३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ५३ हजार २४९ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ६९५ बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यूही झाला आहे. आजच्या नव्या बाधित रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ वर पोहोचला आहे. तर, यापैकी ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ७९ हजार ५५२ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.