खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार :पुनीत बालन
मुंबई खिलाडीज संघाच्या जर्सीचे अनावरण : कर्णदारपदाची धुरा विजय हजारेकडे
पुणे : अल्टिमेट खो-खो लीगनंतर खो-खो खेळ आणि खेळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. या लीगच्या माध्यमातून खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवायचे आहे. असे प्रतिपादन मुंबई खिलाडीज संघाचे सहमालक व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केले.
पहिल्या-वहिल्या ‘अल्टिमेट खो-खो लीग’ मधील मुंबई खिलाडी संघाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण गुरुवारी मुंबईत करण्यात आले. यावेळी संघाच्या कर्णधारपदी विजय हजारे यांच्या निवडीची ही घोषणा यावेळी करण्यात आली. जर्सीच्या अनावरणप्रसंगी मुंबई खिलाडी संघाचे सहमालक आणि प्रसिद्ध रॅपर बादशाह, युवा उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल- बालन, सीईओ मधुकर श्री तसेच मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, यांच्यासह प्रशिक्षक शोबी आर. आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.
यावेळी बादशाह म्हणाले, माझे आणि खूप खेळाचे भावनिक असे नाते आहे. माझी आई राज्यस्तरावरील खेळाडू होती. त्यामुळे खो-खो खेळाबद्दल मला विशेष प्रेम आहे. अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून माझ्या आयुष्याच्या नवा चाप्टर सुरू झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जान्हवी धारिवाल- बालन या खो- खो लीग मधील एकमेव महिला मालक आहेत. भारताच्या क्रीडा संवर्धनामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा उद्देशाने मी लीगमध्ये सहभागी झाले. माझ्या समावेशामुळे मुली आणि महिला खो-खो खेळाकडे वळतील असा विश्वास जान्हवी धारिवाल- बालन यांनी यावेळी व्यक्त केला.
पहिल्या हंगामातच आम्ही छाप पाडू : विजय हजारे
कोल्हापूरचा प्रतिभावंत खेळाडू विजय हजारे यांच्याकडे मुंबई खिलाडी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. कर्णधारपदी नियुक्त केल्याबद्दल संघ मालकांस प्रशिक्षकांचे हजारे यांनी आभार मानले. आमच्याकडे अनेक नवोदित खेळाडूचा भरणा आहे. मात्र सर्व प्रतिभावंत आहेत. त्यामुळे पहिल्या हंगामात आम्ही आमची छाप पाडू असे विजयने यावेळी सांगितले.