महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावण्यात आला होता. त्यानंतर आता अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावली गेली आहे.तर काही जिल्ह्यात जमावबंदी आणि मिनी लॉकडाऊन लावला आहे. पण हा लाॅकडाऊन पुरेसा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर आता टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन इतक्यात उघडता येणार नाही. मुंबईत सध्या रिकव्हरी चांगली होताना दिसते आहे, मात्र महाराष्ट्रात असं चित्र नाही. महाराष्ट्रातले 13 ते 14 जिल्हे आहेत जिथे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र महाराष्ट्रातलं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. आणखी किमान 15 दिवसांचे निर्बंध हे असतील असं मला वाटतं, असं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.
जेव्हा अनलॉक होईल तेव्हा मात्र मास्क घातला नाही, सॅनिटायझेशन केलं नाही किंवा अंतर बाळगलं नाही तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त दंड घेतला जावा. महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो, असंही डॉ. शशांक जोशी यांनी संगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. त्या गाईडलाईन्समध्ये कुठे लॉकडाऊन लागू शकतो, त्याबद्दलचं चित्र स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्ह्यांच्या टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट आठवड्यापेक्षा 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे लॉकडाऊन लावण्यात यावा, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.