ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?, खासदार संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “सध्या आम्ही…”
मुंबई |
महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण मागील काही आठवड्यांपासून ड्रग्जसंदर्भातील आरोप प्रत्यारोपांमुळे ढवळून निघालं आहे. त्यातच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असं म्हणत नव्याने हल्लाबोल केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडूनही त्याला उत्तर दिलं जात आहेत. त्यातच शिवसेनेकडूनही या संदर्भात खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून भूमिका वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलीय. असं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र या सर्व प्रकरणावर शांत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच मुख्यमंत्री मात्र या विषयावर भाष्य करताना दिसले नाहीत. उद्धव ठाकरे या प्रकरणावर बोलणार की नाही?, कधी बोलणार याबद्दलचा खुलासा राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री या (ड्रग्ज आरोप प्रत्यारोप) प्रकरणावर बोलत का नाहीत?, असा प्रश्न टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “योग्य वेळी ते बोलतील. सध्या आम्ही पुरेसे आहोत. या विषयावर बोलणं हे मुख्यमंत्र्यांच कामच नाहीय. राज्य संभाळणं त्याचं काम आहे,” असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत पवारांना पुरावे सादर करणार असं वक्तव्य केलं होतं त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली. “या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही यामध्ये,” असं राऊत म्हणाले आहेत.