लसीकरण कधी जोमाने सुरू होणार? केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणतात…
नवी दिल्ली – भारतात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरीही लसींचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. वेळेत नागरिकांचं लसीकरण होत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जातेय. त्यामुळे देशात पुन्हा जोमाने केव्हा लसीकरण होईल असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलंय. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आठ राज्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या महिन्यातच 8 कोटी व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. तसेच जूनमध्ये 9 कोटी डोस मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा आणि तेलंगना राज्यांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता.
कोरोना लसींचा साठा हळूहळू उपलब्ध होईल. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे. त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लोकांचं लसीकरण अर्धवट ठेवता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच 30 एप्रिल रोजी राज्यांना येत्या 15 दिवसात व्हॅक्सिन मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार 14 मे रोजी पुढच्या 15 दिवसात किती आणि केव्हा व्हॅक्सीन मिळेल हे सांगण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत १७.५२ कोटी लस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत 17.52 कोटी लस देण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या रिपोर्टनुसार 25,47,534 सत्रांसाठी 17,52,35,991 डोस देण्यात आले आहेत. यात 95,82,449 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65,39,376 कामगारांना दुसरा डोस देण्यात आला. त्याशिवाय 45 ते 60 वयोगटातील 5,58,83,416 व्यक्तिंना पहिला डोस आणि 78,36,168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. तर ज्येष्ठ नागरिकांना 5,39,59,772 पहिला डोस आणि 1,62,88,176 ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 24.4 लाखाहून अधिक लस देण्यात आली. लसीकरणाच्या116 व्या दिवशी (11 मे रोजी) 24,46,674 डोस देण्यात आले.